महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानातही ४० आकडा महत्त्वाचा!एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपसोबत गेले. त्यामुळे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद गेलं. शिंदेंसोबत ४० पेक्षा अधिक आमदार गेले. त्यावेळी अलीबाबा आणि ४० चोर अशा स्वरुपाची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. अजित पवार सरकारमध्ये सामील झाले. तेव्हा त्यांच्या मागे किती आमदार आहेत याची चर्चा झाली. यावेळीही ४० आमदारांचा दावा करण्यात आला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ४० आकडा महत्त्वाचा ठरला. आता राजस्थानातही ४० आकडा चर्चेत आहे आणि महत्त्वाचा ठरताना दिसत आहे.राजस्थानात १९९ मतदारसंघांसाठी मतदान झालं. सध्या मतमोजणी सुरू आहे. एक्झिट पोल्सचा विचार केल्यास काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर आहे. बहुमतापासून दूर राहिल्यास अपक्ष आणि बंडखोर आमदारांच्या मदतीनं सत्तेची खुर्ची गाठायची अशी दोन्ही पक्षांची योजना आहे. या निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या जवळपास ४० जणांनी बंडखोरी केली आहे.दोन्ही पक्ष अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपचे नेतेदेखील अपक्ष आणि बंडखोरांच्या संपर्कात आहेत. याशिवाय लहान पक्षांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्याशी निवडणुकीनंतर युती करण्याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानातही ४० आकडा महत्त्वाचा ठरणार आहे.